तलवारींचे आघात थांबले, तोफाही ठंडावल्या; आता फक्त आक्रोश आणि किंचाळ्यांचा साक्षी होत आहे...
शेवटपर्यन्त साथ देण्याचे व्रत घेणाऱ्या साथीदारांना रणभूमी वर कोसळताना पाहतो आहे...
साम्राज्याचे प्रतीक म्हणून युद्धात भूषवलेला तो ध्वज आता काही क्षणांचा सोबती भासतो आहे...
शत्रूच्या
अजस्त्र तोफेच्या तोंडी जाण्याऐवजी स्वतःचीच तलवार मानेवर ठेवून बलिदानाची तयारी
करतो आहे...
विजयी मुद्रेचा आव आणून आपणच केलेली माणुसकीची कत्तल पाहत आहे...
जमिनीच्या एका तुकड्यावर अधिराज्य गाजवायसाठी केलेले डावपेच आणि राजनीती फार मोठ्या पापासारखी भासत आहे...
आणि
म्हणूनच आपल्याच कृत्यांची उपरति होऊन; प्रायश्चित्त म्हणून येथेच
समाधी घेत आहे...
विजयवीरांनी कोरलेल्या युद्धाच्या गाथा कुठल्यातरी कातळावर मिरवते आहे...
अनेक वर्षांपूर्वी झालेल्या या युद्धाच्या जखमा आजही उरात बाळगणाऱ्या नवीन पीढ़ीलादेखील मीच चिथवते आहे...
"हरला तो दुष्ट आणि जिंकला तो
श्रेष्ठ" या एकाच तत्वावर रचलेल्या इतिहासचे आजही मानचिन्ह ठरत आहे...
-नितीश साने ©
No comments
Post a Comment