"स्वतःचेच विचार संग्रहित करून ठेवावेत म्हणून आपण ते कागदावर उतरवून काढतो, आपल्या आठवणींचा तो कागद जपून ठेवतो, नंतर जेव्हा काही दिवसांनंतर किंवा काही वर्षांनंतर ते उघडून आपण वाचतो तेव्हा आपल्याच चेहऱ्यावर स्मितहास्य उमटतं! तेव्हा जो स्वतःशी संवाद होतो तो म्हणजे एकांत! असाच संवाद कधीतरी व्हावा अशी इच्छा बाळगून हे लिहितो आहे, म्हणून हा एकांत!"

Friday, 9 December 2016

मळभ

Photo courtesy : Google Images बघता बघता आणखी एक संध्याकाळ झाली तशी आकाशाकडे खिळलेली नजर पुन्हा जमिनीवर आली. thumbnail 1 summary
Photo courtesy : Google Images
बघता बघता आणखी एक संध्याकाळ झाली तशी आकाशाकडे खिळलेली नजर पुन्हा जमिनीवर आली.
सूर्य मावळला तशी घराची ओढ़ लागली तरी पाऊल मात्र हलेना...
घराचं चित्र डोळ्यासमोर आलं पण गोठयातली शेवंता आणि ढवळ्या-पवळ्याची जोड़ी मात्र कितीही प्रयत्न करूनही आज त्या चित्रात येत नव्हती...
नजर दारातून आत डोकाऊ पाहात होती, पण काळीज मात्र धजावत नव्हतं! आतली परिस्थिती तरी काय वेगळी असणार होती.

हाल तर कोणाचेच बघवत नव्हते, आतल्यांचेही नाहीत आणि बहेरच्यांचेही नाहीत...
फरक फक्त एवढा होता की ज्यांचे संपवता येणं शक्य होतं, त्यांचे आज दुपारीच संपवले होते! बकीच्यांनी फक्त भोगत रहायचे होते; आकाशात रोज येणाऱ्या त्या मळभांकडे बघत!
घरी गेल्याक्षणी आज प्रश्नांचा भडिमार होणार होता...

खाली बघता बघता त्या मातीत जणू स्वतःचच प्रतिबिंब दिसू लागलं. उन्हात न्हाऊन निघाल्यामुळे आलेला काळाठिक्कर वर्ण आणि चेहऱ्यावरच्या सुर्कुत्यांप्रमाणे असलेल्या त्या भेगा!
पण ते निश्चल प्रतिबिंब देखील आज सवाल करू लागलं,
"ज्या जीवांनी ही जमीन नांगरली, ज्यांनी कष्टाने इथे शेती पिकवली, ज्यांच्यामुळे तुझ्या कुटुंबाची एकेकाळी भरभराट झाली, त्यांना खाटिकाच्या हाती देताना तुला लाज कशी नाही वाटली?"
शेवटी मन सुन्न झालं म्हणून मनतला गोंधळ शांत करण्यासाठी रेडियो लावला तेव्हा शब्द कानावर पडले,
"
तारीफ करू क्या उसकी जिसने तुम्हे बनाया!" 
आता मात्र अश्रुंचा बांध फुटला होता!
खरचं आता उरलं तरी काय होतं भोगायचं? सर्व हालअपेष्टा सोसुन देखील उद्या पुन्हा त्याच्याच चरणी प्रार्थना करत त्या आशादाई माळभाकड़े डोळे लावून बसायचं होतं!
"
तारीफ करावी तेवढी थोडीच् होती!"

-नितीश साने ©


No comments

Post a Comment